Wednesday, October 29, 2014

सर

माझे गुरुबंधू आदरणीय लॉरेन्स सर यांची फेसबुकवर लिंक मिळाल्यामुळे बर्याच वर्षानंतर आम्हा दोघांची गाठभेट होऊन परुळेकर सरांच्या आठवणींना उजाळा मिळाला .थोड्या दिवसांनंतर त्यांना मी परुळेकर सरांवर एक ६ वर्षापूर्वी लिहिलेल्या माझ्या एका ब्लॉगची लिंक पाठवून दिली.तो ब्लॉग वाचून ते एकदम भारावून गेले आणि लवकरच सरांच्या जन्मचा वर्धापनदिन २० जुलै रोजी येत आहे त्यामुळे तू त्यांच्या बद्दल थोडेफार लिही असे त्यांनी मला सुचविले . त्यांच्या विनंतीला मान देऊन थोडे सरांबद्दल माझे विचार मांडत आहे ….
सरांच्या सानिध्यात साधारण ५ वर्षे मी सतत होतो.म्हणजे इयत्ता ५वी ते १०वी पर्यंत मी दररोज त्यांच्या कडे अभ्यासाकरिता जात असे. आत्ताचा जो "टयूशन" नावाचा प्रकार/बाजार चालला आहे त्यामध्ये आणि सरांच्या शिकवणीमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता कारण त्यांनी विद्या ह्या देवीला दुकानामध्ये विकावयास ठेविले नव्हते. ते आमरण तिचे भक्तच राहिले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे स्तोत्र त्यांनी तंतोतंत पाळिले. त्यांच्या कडे शिकायला आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेमाने,हळुवारपणे घासून पुसून आणि लखलखीतपणे स्वच्छ करून आयुष्याच्या वाटेला लाविले.श्रीमंत-गरीब,उच्च-नीच, धर्म-जाती ह्या सारख्या भिंती त्यांनी फार पूर्वीच तोडून टाकल्या. एवढ्या वर्षांच्या आमच्या सहवासात मी त्यांना एकदाही -पुन्हा बोलतो एकदाही- कोणावर हात उगारताना तर सोडाच पण कोणावर रागवताना,मोठ्याने बोलताना किंवा कोणाला ओरडताना कधीही पहिले नाही. त्यांचा चेहेरा हा सदैव प्रसन्न व हसरा असायचा कारण त्यांचे मनहि तितकेच प्रसन्न आणि हसरं होतं .
सर आम्हा विद्यार्थ्यांना लिहावयास नेहीमी चांगल्या दर्ज्याचे A4 साइजचे कागद देत .माझे बाबा - जे त्यांचेच विद्यार्थी होते - हे मर्चंटनेव्ही मध्ये नोकरी करत आणि जेंव्हा जेंव्हा घरी येत तेंव्हा त्यांची पहिली फेरी हि सरांकडे असे. .एकदा ते असेच घरी आल्यावर सरांना भेटायला गेले आणि तिथे बसलेल्या विद्यार्थांकडे ते कागद पाहून सरांना म्हणाले कि तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मी एखाद दोन बंडळ पाठवून देतो . थोड्या दिवसांनी बाबांनी मला सरांकडून ह्या कागदाचा एक नमुना मागून आणायला सांगितला. मी त्यावेळी सर जिथे राहत त्या त्यांच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या वास्तव्यात त्यांच्या खोलीत गेलो आणि त्यांना एक कागद नमुना म्हणून देण्यास सांगितले .सर मला बसावयास सांगून आत गेले आणि थोड्या वेळाने बाहेर येउन त्यांनी माझ्या हातात एक दहा-पंधरा पानांचा एक गठ्ठा ठेवला आणि म्हणाले हा नेऊन बाबांना दे हो. मी तेव्हा साधारण सहावी किंवा सातवीला असेन त्यामुळे मी त्यांना आपला भाभडा कि काय म्हणतात असा प्रश्न करून म्हटले सर बाबांनी फक्त एकच कागद मागितले आहे हो.सरांनी मला एकदम जवळ ओढले आणि मायाने माझ्या पाठीवरून हाथ फिरवत म्हटले "अरे बाळ कोणी एकच गोष्ट मागितली तरी आपण जास्त द्यावी रे बोनी". अशी विचारसरणी आमच्या परुळेकर सरांची ….
शेवटी शेवटी जेव्हा त्यांची तब्येत थोडी खालावली तेंव्हा त्यांना त्यांच्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या दवाखान्यात ठेवले होते म्हणून मी आणि माझी आई त्यांना भेटायला गेलो.त्यांच्या आणि बाईंबरोबर थोड्या गप्पागोष्टी करून व त्यांच्या तब्येतीची काळजी घायला सांगून आम्ही जायला उठलो तेव्हा सरांनी माझा अभ्यास कसा काय चाललाय म्हणून मला विचारले. माझ्या आईने जेंव्हा त्यांना सांगितले कि, ह्याची सध्या इंजीनीयरिंग ची परीक्षा चालू आहे पण हा तुम्हाला इथे येउन भेटायला उतावळा झाला होता म्हणून आजच आलो ,तेव्हा सर मला म्हणाले "अरे बोनी इतक्या लांब यायची गरज नव्हती रे. मी ठीक आहे रे बाळ .तु काळजी करू नकोस".
सर अंथरुणावर झोपूनच आमच्याशी बोलत होते तरी पण मला त्यांच्या पाया पडावेसे वाटले. मी जरा खाली वाकलो आणि सरांना म्हणालो "सर पाया पडतो" आणि हाथ पुढे करून त्यांच्या पायाला स्पर्श करून परत तोच हाथ माझ्या छातीला लाविला . सर आशीर्वादार्थ हाथ उचलून बोलले " अरे राहूदे राहूदे ….देव तुला सुखी ठेवो "
…. सरांची हीच आयुष्यभर पुरणाऱ्या आशीर्वादाची शिदोरी उराशी बाळगून आता जीवनाचा प्रवास खंबीरपणे करावयाचा आहे …

Thursday, May 8, 2014

पहाटेचे स्वप्न :


पहाटेचे स्वप्न :


बाळ अरे बाळ कधी रे येत आहेस भेटायला ? 



बरेच दिवस झाले की रे भेटून. 

संसाराच्या धावपळीत बुडून गेलास की रे पार.

चल परत एकदा भेटूया.

उघड्या आकाशाखाली,चांदण्या रात्री मनमुराद गप्पा मारुया. 

खूप खूप बोलावयाचे आहे. 

तू येशील,खात्री आहेच मला !!!! 

गूरु रतनगड प्रेमाने साद घालतायेत. 

सकाळची स्वप्ने खरी ठरतात अस म्हणतात …